Saturday, February 5, 2011

चिंतामणि | थेऊर Chintamani | Theur अष्टविनायक दर्शन माहिती


मोटार-थांब्यापासून अवघ्या एका फर्लांगावरच श्रीचिंतामणीचे देवालय आहे. देवालयाचे महाद्वार उत्तराभिमुख आहे. चिंचवडचे मोरया गोसावी यांचे वंशज श्री चिंतामणि देव यांनीच हे देवालय बांधले. त्यानंतर साधारण शंभर एक वर्षांनी, श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी सभामंडप बांधला आणि ह्या देवालयाचा विस्तार केला. नंतर पेशव्यांचे सेनापतीहरिपंत फडके आणखी इतर भक्तमंडळीनी मिळून ह्या देवालयात काही फेरफार करून त्याची भव्यता आणि शोभा अधिक वाढविली.
देवालयाच्या आवाराबाहेर जवळच पेशव्यांचा वाडा होता. परंतु तो वाडा आता तेथे उभा नाही. मुख्य दिंडीदरवाजाचे काही अवशेष मात्र अजूनही शिल्लक आहेत. वाड्याचे आवार बरेच भव्य दिसते. तेथील भव्य अवशेषांवरून त्या वाड्याच्या पूर्वीच्या भव्यतेची कल्पना येते. ह्या वाड्यापासून थेट नदीपर्यंतची फसरबंदी वाट पेशव्यांनी बांधून काढली होती. ही फरसबंदी वाट मात्र अजूनही सुस्थितीत राहिलेली आहे.
थेऊर गावाच्या तिन्ही बाजूला मुळमुठा नदीचा जणू काय वेडा पडलेला आहे. मुळामुठा नदीला अगदी बारमास, उदंड पाणी असते. त्यामुळे थेऊरला पाण्याची कधीच पंचाईत पडत नाही. नदीच्या डोहाला कदंबतीर्थ अथवा चिंतामणि तीर्थ असे नाव आहे.
श्रीचिंतामणि हा डाव्या सोंडेचा गनपती आहे. मांडी घातलेले आसन आहे. मूर्ती अगदी रेखीव आहे. मूर्तीचे तोंड पूर्व दिशेला आहे.
गौतम ऋषीच्या अहिल्येची देवांचा इंद्र यान फसवणूक केली व आपली कामेच्छा पुरी केली. गौतम ऋषींना हीगोष्ट कळताच त्यांनी अहिल्याआणि इंद्र अशा दोघांनाही शाप दिला. अहिल्या शिळा होऊन पडली आणि इंद्राच्या अंगाला क्षते पडली. सर्व देवांना फार दुःख झाले. त्यांनी त्या शापाबद्दल गौतमऋषीची विनवणी केली. गौतम ऋषींनी मग उःशाप दिला. श्रीगजाननाची आराधना केल्याने तुझ्या पापाचे क्षालन होईल असे त्याला सांगितले. बृहस्पतींनी इंद्राला गणेशमंत्र दिला. इंद्राच्या आराधनेमुळे श्रीगजानन प्रसन्न झाले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. त्यामुळे इंद्राचे रूप पालटले आणि तो पुन्हा पूर्ववत दिसू लागला.
हा गणपती, आपल्या मनात चितिलेले देतो म्हणून याचे नाव चिंतामणि असे पडले.
ह्या क्षेत्रासंबंधी दुसरी एक कथा सांगण्यात येते ती अशी -
ब्रह्मदेवाने आपल्या चित्ताला स्थैर्य प्राप्त व्हावे म्हणून चित्तवृत्तीचा प्रकाशक चिंतामणि याची आराधना केली. चिंतामणि प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला वर दिला. त्यामुळे ब्रह्मदेवाच्या चित्ताला स्थैर्य लाभले. ह्या प्रसंगाचे स्मारक म्हणून हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. येथे साधकांच्या मोहजालाचे निराकरण होते. आणि त्यांना चित्तशांती लाभते.
योगसिद्धीचा लाभ होतो. आणि आत्मसाक्षात्कारही होतो.
याच क्षेत्रात कौडिण्य ऋषींचा आश्रम होता. मोरया गोसावी यांनी सुद्धा येथील अरण्यात उग्र तपश्चर्या केली. याच ठिकाणी त्यांनी त्यांना सिद्धि प्राप्त झाली होती. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची पत्नई रमाबाई ह्यांच्या येथील वास्तव्यामुळे ह्या क्षेत्राला विशेष महत्त्व आले.
पेशव्यांचे दैवत गणपती. परंतु श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यंची ह्या श्री चिंतामणीवर विशेष भक्ति होती. राज्यकारभारातून थोडीशी जरी फुरसत मिळाली तरी विश्रांतीसाठी आणि मनःस्वास्थ्यासाठी, ते थेऊर येथील आपल्या वाड्यात येऊन रहात. ह्या चिंतामणीच्या सान्निध्यात राहूनच त्यांनी आपल्या अंगातील राजयक्ष्मा ह्या रोगाशी सामना दिला. आणि आपले प्राण त्यांनी शेवटी, श्रीचिंतामणीच्याच चरणावर अर्पण केले. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या पत्नी रमाबाई ह्या त्यांच्याबरोबरच सति गेल्या. मुळामुठा नदीच्या काठावर सतीचे वृंदावन आहे. कार्तिक वद्य ८ला दरवर्षी तेथे रमामाधव पुण्यतिथीला उत्सव साजरा केला जातो.
देवालयाच्या एका ओवरीमध्ये श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांचे तैलचित्र लावलेले आढळते.
थेऊरला ह्या श्री चिंतामणीचा उत्सव दरवर्षी, भाद्रपदातल्या चतुर्थीला फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
थेऊर गावी चिंतामणि । देवेंद्रा जो वरदपाणी ।
गौतमाची शापवाणी । ज्याच्या कृपें आटली ॥

No comments:

Post a Comment